विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

Breaking

सखाराम गणेश देउसकर

 


            *सखाराम गणेश देउसकर*

(क्रांतिकारी लेखक, इतिहासकार व पत्रकार)


          *जन्म : 17 दिसंबर, 1869*

                 (करों, बिहार प्रदेश) 

           *मृत्यु : 23 नवंबर, 1912*

कर्म भूमि : भारत

मुख्य रचना : 'महामति रानाडे' (1901), 'झासीर राजकुमार' (1901), 'बाजीराव' (1902)

विद्यालय : आर. मित्र हाईस्कूल, देवघर

शिक्षण  : मैट्रिक

प्रसिद्धि : क्रांतिकारी लेखक, इतिहासकार तथा पत्रकार।

नागरिकता :भारतीय                                                                          .एके काळी मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले आणि मराठी माणसे मुलुखगिरी करीत भारतभर पसरली. पेशवे बिठूरला होते, त्याकाळी बरीच मराठी कुटुंबे त्याभागात कर्तृत्वाचे मनोरे उभारीत तिकडेच स्थायिक झाली. भोसले बंगालच्या नवाबाकडून चौथ वसुल करीत. त्यासाठी त्यांचे प्रतिनिधी कृष्णभट्ट रायकर मुर्शीदाबाद येथे राहू लागले. बीरभूमचा शासनकर्ता वदियुज्जामा नवाबाकडून हकालपट्टी होण्यापासून रायकरांच्या मध्यस्थीमुळे वाचला. त्यामुळे वदियुज्जमाने कृष्णभट्टांना देवधर जवळ असलेले ‘करों’ ग्राम जहागीर स्वरूपात प्रदान केले.

इकडे दुसऱ्या बाजीराव पेशवेंचे भाऊ श्रीमंत अनंतराव पेशवेंचे आश्रित म्हणून देऊस गावचे सदाशिव देऊसकर बनारसला राहू लागले. करोंचे रामकृष्ण रायकर व देऊसकर यांचा बनारसला परस्पर परिचय होऊन त्यांच्या घनिष्टतेची परिणती रायकरांच्या बहिणीचा विवाह सदाशिवबरोबर होण्यात झाली. या सोयरिकी प्रीत्यर्थ सदाशिवरावास रायकरांच्या करोंग्राम मध्ये जमीन जुमला प्राप्त होऊन देऊसकर कुटुंब करोंग्रामनिवासी झाले.

कालांतराने सदाशिवरावास एक मुलगा आणि एक मुलगी झाली. पुढे मुलगा श्री. गणेश वाराणसीत वेदाध्ययन करून गिद्धोरच्या महाराजाकडे ‘राजपंडित’ पदावर नियुक्त झाला. पं. गणेशशास्त्रींचा विवाह होऊन १७ डिसेंबर १८६९ला त्यांना करों येथे पुत्ररत्न प्राप्त झाले. तेच सखाराम देऊसकर.

बालपणापासूनच सखारामच्या खडतर जीवनाची सुरुवात झाली. तो पाच वर्षाचा असताना त्याचा आईचे देहावसान झाले. वडील गणेशपंतांनी पुन्हा विवाह केला नाही. त्यांची बहीण विधवा होती. सखारामच्या या आत्यानेच सखारामचे पालनपोषण केले. मराठी भाषा साहित्य संस्कृतीचे भरपूर ज्ञान आत्येला होते. महाराष्ट्राचा इतिहास तिला अवगत होता. सखारामने पुढील आयुष्यात जे उज्ज्वल देशकार्य केले, त्याचे श्रेय त्याच्या आत्याने दिलेल्या संस्कार शिदोरीलाच द्यायला हवे.

वेदाध्ययनासाठी सखाराम काही काळ बनारसला गेला. वेदशिक्षा प्राप्त करून सखाराम करों येथे परत आला. देवघरच्या इंग्रजी शाळेत त्याचे नाव टाकण्यात आले. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर याच शाळेत १८९३ मध्ये सेकंड पंडित पदावर सखारामजी नियुक्त झाले. १५ रु. मासिक पगारावर त्यांच्या कर्मजीवनाची सुरुवात झाली. विद्यार्थी जीवनाताच साहित्यसाधना व लेखन प्रकाशनाची सुरुवात झालेली होती. वेळ मिळताच राजनारायण बसुंचे घरी विभिन्न विषयावर उहापोह करत. ‘हितवादी’ या प्रसिद्ध नियतकालिकात सखारामजींचे लेख प्रसिद्ध होऊ लागले.

      या सुमारास देवघरचे मॅजिस्ट्रेट होते मिस्टर हार्ड. नावाप्रमाणेच ते कठोर आणि जनतेवर अत्याचार करणारे होते. सखारामजींनी हार्डच्या कारभारावर कठोर टीका करणारे लेख हितवादी मधून लिहिले. ते मि. हार्डना सलू लागले. ज्या शाळेत देऊसकर नोकरी करीत होते त्या शाळेच्या संचालक समितीचे अध्यक्ष हार्डच होते. त्यांच्या नाराजीने देऊसकरांना शिक्षकाची नोकरीच नव्हे, तर देवधर जिल्हाही सोडावा लागला. तेव्हा देवघर सोडून सखारामजी कलकत्त्यास आले. साल होते १८९७.

सुरूवातीला ‘सर्वग्राही’ या संवादपत्रात काही काल काम केले. ‘हितवादी’मधील लिखाणामुळे त्यांची देवघरची नोकरी गेली, हे लक्षात घेऊन ‘हितवादी’च्या चालकांनी सखारामजींना मुद्रfत तपासनीसाच्या जागेवर तीस रूपये पगारावर नियुक्त केले. कालीप्रसन्न काव्य विशारद तेव्हा संपादक होते. काव्य विशारद यांच्यानंतर १९०७ मध्ये ९० रु. पगारावर पं. सखाराम ‘हितवादी’च्या संपादकपदावर विराजमान झाले. मराठी विद्वान पंडित बंगाली पत्रकारिकेत उच्च पदावर असण्याची इतिहासातील बहुधा एकमेव घटना आहे.

परंतु हे संपादकपद फार काळ टिकलं नाही हे दुर्दैव. १९०७ मध्ये सुरतला कांग्रेस अधिवेशन झाले. त्यात जहाल आणि मवाळ गटांमध्ये मतभेद जोरात झाले. ‘हितवादी’चे प्रबंधक तेथे हजर होते आणि ते मवाळांची बाजू घेत होते. त्यामुळे त्यांनी संपादक देऊसकरांना लोकमान्य टिळकांच्या विरूद्ध लिखाण करण्यासंबंधी तार पाठवली. परंतु देऊसकर टिळकभक्त असल्याने त्यांनी टिळकांविरूद्ध लिहले नाहीच. उलट ‘स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’ या उक्तीवर संपादकीय अग्रलेख लिहला. स्वत:ची तत्वनिष्ठा ते सोडू शकले नाही. त्यामुळे त्यांना लवकरच ‘हितवादी’संपादकपदाचे त्यागपत्र द्यावे लागले. ‘हितवादी’सोडल्यावर राष्ट्रीय शिक्षा परिषदेच्या ‘बेंगाल नॅशनल कॉलेज’ मध्ये बंगला भाषा व भारतीय इतिहास या विषयाचे प्राध्यापक म्हणून देऊसकरांची नियुक्ती झाली कलकत्ता वास्तव्यात राष्ट्रभक्तीपर चेतना जागृतीचे अनेक उपक्रम देऊसकरांनी राबवले. शिवाजीउत्सव करण्यामागे त्यांचीच प्रेरणा होती. त्यांनी तगादा लावून रवींद्रनाथ टागोरांकडून त्यांनी ‘शिवाजीउत्सव’ कविता लिहून घेतली.


सखारामजींना विद्यार्थीदशेपासूनच लेखनाची उर्मी होती. त्यांनी बंगालीत १२ पुस्तके व ४८ लेख प्रकाशित केले. त्यातील ८ पुस्तके व २० लेख महाराष्ट्रासंबंधी आहेत. त्यांचे ‘देशेर कथा’ हे पुस्तक क्रांतिवीरांची गीता ठरले. या पुस्तकाच्या पाच आवृत्त्या निघून ३० हजार प्रती खपल्या. हे त्याकाळातले अद्भुत रेकॉर्ड आहे. ब्रिटिश सरकार भारताला कसे लूटत आहे, याचा या पुस्तकात पर्दाफाश केला आहे. देऊसकरांनी लिहिलेले ‘तिलकेर मुकदमा ओ संक्षिप्त जीवन परिचय’ हे पुस्तकही शासनाने जप्त केले. ‘शिवाजी’, ‘महामती रानडे’, ‘झाशीर राजकुमार’, ‘बाजीराव’, ‘आनन्दीबाई’, ‘कृषकेर सर्वनाश’, ‘बंगीय हिंदू जाती कि ध्वंन्सोन्मुख’ ही त्यांची बंगाली पुस्तके. ‘साहित्य’, ‘भारती’, ‘बंगदर्शन’ इ. मासिकांतून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत.                                   देशेर कथा’ पुस्तकावर १९१० साली जप्ती आली व देऊसकरांच्या मागे शासनाचा ससेमिरा वाढला. त्याचा उपसर्ग अन्य सहकाऱ्यांना होऊ नये म्हणून देऊसकरांनी ‘बेंगाल नॅशनल कॉलेज’मधून प्राध्यापकपदाचा राजीनामा दिला. पत्नी व पुत्राचे निधन आगोदरच झालेले. नंतर त्यांच्या कन्येचेही निधन झाले. या सर्व प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम देऊस्करांच्या स्वास्थ्यावर होऊ लागला. त्यामुळे त्यांनी कलकत्ता सोडले व स्वगृही ‘करों’ ग्रामला ते परतले. तेथेही त्यांच्या स्वास्थ्यात सुधारणा झाली नाही. तब्येत घसरतच राहिली व अन्तत: देवघरच्या भट्टवाडीमध्ये २३ नोव्हेंबर १९१२ ला देऊसकरांचे निधन झाले. त्यावेळेस त्यांचे वय ४३ वर्षांचे होते.

पं. सखाराम गणेश देऊसकरांच्या लेखनाने इतिहास, चरित्र इ. विषयांचे बंगाली साहित्य दालन समृद्ध केले, तसेच त्यांचे लेखन राष्ट्रीय आंदोलनामध्ये मर्मग्राही प्रेरणांचे संस्कार करीत राहिले. यंदाचे वर्ष देऊसकरांच्या पुण्य-शताब्दीचे आहे. त्यांच्या स्मरणार्थ देशभर कार्यक्रम व्हायला हवे. टपाल तिकीट निघायला हवे. देऊस गावानेही काही करायला हवे. त्यांचे चरित्र मराठीत प्रसिद्ध होणे अत्यंत गरजेचे आहे.

पं. देऊसकर यांच्या जन्मगावी करों येथे त्यांच्या जागेत त्यांच्या नावाने एक शाळा सुरु आहे. त्यांच्या नांवे एक स्मारक समितीही तेथे कार्यरत आहे. कोलकाता येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’ दरवर्षी त्यांच्या नावे एक व्याख्यानमाला आयोजित करते. भवानीपूर कोलकाता येथील पूर्वीच्या टाऊनशेड रोडला कोलकाता महानगर पालकेने ‘सखाराम गणेश देऊसकर सारणी’ असे नवे नाव दिले आहे.

       

       

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق