दादा धर्माधिकारी
********************************
प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत आचार्य दादा धर्माधिकारी यांचा जन्म १८ जून १८९९ रोजी झाला.
शंकर त्रंबक धर्माधिकारी हे त्यांचे पूर्ण नाव, पण ते दादा धर्माधिकारी या नावाने ओळखले जात असत. त्यांचे नागपूर मध्ये शिक्षण सुरु असताना महात्मा गांधींनी असहकाराची चळवळ सुरू केली, त्यावेळी १९२० साली शिक्षण सोडून धर्माधिकारींनी चळवळीत उडी घेतली, आणि पुढे आयुष्यभर राष्ट्रकार्य केले.
धर्माधिकारी यांनी नागपूरच्या टिळक विद्यालयात शिक्षकाची नोकरी पत्करली. नोकरी दरम्यान देखील ते स्वातंत्र्यासाठीच्या चळवळी मध्ये भाग घेत राहिले. १९३५ मध्ये ते वर्धा येथे राहू लागले. गांधी सेवा संघ या संस्थेचे ते सक्रिय कार्यकर्ता होते. तेथे असताना ते भारतातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या संपर्कात आले. भारत छोडो आंदोलनात झालेल्या त्यांच्या अटके नंतर जेव्हा ते सुटून कारागृहा बाहेर आले, तेव्हा ते मध्य प्रदेशाच्या काउन्सिलवर निवडले गेले.
आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्यांचा सहभाग होता. आपल्या आयुष्यातली अनेक वर्षे दादा धर्माधिकारींनी दलितांच्या आणि महिलांच्या उत्थानासाठी वेचली. दादा धर्माधिकारी हे वैचारिक क्रांतीच्या पक्षातले होते. त्यांच्या मते समाजा मध्ये परिवर्तन आणण्यासाठी लोकांच्या विचारांत परिवर्तन होणे आवश्यक आहे.
कॉलेजची कोणतीही पदवी हाती नसताना दादा धर्माधिकारी यांचा हिंदी, संस्कृत, मराठी, बंगाली गुजराती आणि इंग्रजी ग्रंथाचा चांगला अभ्यास होता. ते चांगले लेखक होते. हिंदी मराठी आणि गुजराती भाषेत त्यांनी बरीच पुस्तके लिहिली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी हे दादा धर्माधिकारींचे सुपुत्र होत.
पुस्तके - अहिंसक क्रांति की प्रक्रिया, आपल्या गणराज्याची घडण, क्रांतिशोधक, गांधीजी की दृष्टी, अगला कदम, तरुणाई, दादा की बोध कथाएं, दादांच्या शब्दांत दादा, नये युग की नारी, नागरिक विश्वविद्यालय एक परिकल्पना, प्रिय मुली, मानवनिष्ठ भारतीयता, मैत्री, युवा और क्रांति, लोकतंत्र विकास और भविष्य, समग्र सर्वोदय दर्शन, स्त्री-पुरुष सहजीवन, हिमालय की यात्रा.
दादा धर्माधिकारी यांचे १ डिसेंबर १९८५ रोजी निधन झाले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा