विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

Breaking

श्रीधर महादेव जोशी

  


 श्रीधर महादेव जोशी 

  टोपणनाव: एसेम

*जन्म: १२ नोव्हेंबर १९०४*

*मृत्यू: १ एप्रिल १९८९*



श्रीधर महादेव जोशी, अर्थात एस.एम. जोशी,  हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते होते. ते प्रथम समाजवादी, नंतर प्रजासमाजवादी आणि शेवटी संयुक्त समाजवादी पक्षाचे सभासद होते. पत्रकारिता, लेखन, वक्तृत्व, राजकारण व समाजकारण या क्षेत्रांतील नि:स्वार्थीपणे अन्‌ अविरतपणे केलेल्या कार्यामुळे ज्यांचे आयुष्यच ‘एक धडपडीचा इतिहास’ बनून गेले असे ते समाजवादी लढवय्ये असून मवाळ वृत्तीचे एक नेते होते.                   

एम. जोशींचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर या गावी झाला. त्यांचे मूळ गाव रत्नागिरीजवळील गोळप होय. एकत्रित असलेले मोठे कुटुंब व एकटे वडील कमवते अशा स्थितीत जेमतेम भागणाऱ्या घरात त्यांच्या आयुष्याची सुरुवात झाली आणि पुढे ही स्थिती आणखीनच बिघडत गेली. १९१५ साली वडिलांचा मृत्यू झाला आणि कुटुंबाची परवड झाली. अशाही परिस्थितीत शिक्षणाविषयीची त्यांची ओढ कायम राहिली. सवलती, शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी अध्ययन सुरूच ठेवले.

एसेएम जोशींचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन काॅलेजातून झाले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही स्वार्थाकडे दुर्लक्ष करून, देशार्थासाठी कार्यरत राहणे एसएम जोशींनी चालूच ठेवले. १९५७ साली ते महाराष्ट्र विधानसभेत आमदार झाले आणि १९६७ साली ते २ऱ्या लोकसभेसाठी खासदार म्हणून निवडून गेले..

घरात दोन वेळच्या जेवणाची पंचाईत असताना आणि स्वतःचेच दु:ख डोंगराएवढे असतानाही देशहिताच्या गोष्टी करण्याची इच्छा त्यांना लहानपणापासूनच होती. जो दुबळा आहे त्याच्या बाजूने आपल्या तत्त्वांची ताकद उभा करणारा हा लढवय्या अगदी लहानपणापासून लोकहितदक्ष असे. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इंग्रजी शिकविणाऱ्या मास्तरांनी चेहऱ्यावर देवीचे व्रण असणाऱ्या एका विद्यार्थ्याला मागे बसायला सांगितले; तेव्हाचा प्रसंग त्यांच्या इतरांसाठी लढण्याच्या आपल्या न्यायी वृत्तीचे दर्शन घडवितो. त्या मास्तरांना त्यांच्या तासाला छान दिसणाऱ्या मुलांनीच पुढे बसावे असे वाटायचे. म्हणून मास्तरांनी ‘त्या’ विद्यार्थ्याला मागे बसायला सांगितले. एस. एम. यांनी याला विरोध केला. समर्पक कारण देऊन त्यांनी त्या विद्यार्थ्याला हट्टाने पुढेच बसवायला लावले. ज्यांना समाज चुकीच्या कारणासाठी नाकारतो, त्यांना स्वीकारण्याची मानवतावादी दृष्टी एस.एम. यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भागच होती – हे सांगणारा हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे.

देश स्वतंत्र व्हावा म्हणून आपापल्या परीने आणि मार्गाने प्रत्येक जण लढत होता. जहाल – मवाळांच्या अखंड प्रयत्नातून आशेचा किरण सामान्यांच्या नजरेच्या टप्प्यात येत होता. हे प्रयत्न, राष्ट्रभक्तीचे वातावरण या सर्वांविषयी एस.एम. यांना विलक्षण ओढ होती. चिरोल खटला लढवून परत आलेल्या लोकमान्य टिळकांची मिरवणूक पाहण्यासाठी गेल्यामुळे त्यांना छड्या खाव्या लागल्या होत्या. हा अनुभव असतानाही १९२० साली टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थींची मिरवणूक काढली गेली, त्यातही ते सामील झाले. याही वेळी त्यांना छड्या खाव्या लागल्या. पण पर्वताएवढ्या निष्ठेसमोर ती शारीरिक शिक्षा त्यांच्यासाठी नगण्य होती. पुणे येथे विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करून तिच्या मार्फत स्वातंत्र्यासाठी प्रयत्न, मुंबईत यूथ लीग परिषदेचे आयोजन अशी कामे करत असताना त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले.

जात-पात व धर्मभेदापेक्षा माणूस श्रेष्ठ आहे हा विचार घेऊन एस.एम. यांनी सनातन्यांचे विचार नाकारले. १९२९ मध्ये तत्कालीन अस्पृश्यांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणून केलेल्या पर्वती येथील (पुणे) सत्याग्रहात त्यांनी पुढाकार घेतला. या सत्याग्रहाला विरोध करायला आलेले सनातनी हजारोंच्या संख्येत होते. पर्वती सत्याग्रहानंतर सनातन्यांनी सत्याग्रहाला विरोध म्हणून सभाही घेतली. त्या प्रचंड सभेचा रोष एस. एम. यांना स्वीकारावा लागला. पण सत्य आणि न्याय्य बाजूसाठी कोणत्याही परिणामांना सामोरे जाण्याची त्यांची तयारी होती.

सविनय कायदेभंग चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. या तुरुंगवासाच्या काळात ते ज्येष्ठ नेत्यांच्या सान्निध्यात आले. येथेच त्यांना मार्क्सवाद व समाजवाद या संकल्पनांचा सखोल परिचय झाला. यातूनच पुढे ते काँग्रेस-समाजवादी पक्षाच्या स्थापनेत व कार्यात पुढाकारासह सहभागी झाले. भारतात, प्रामुख्याने महाराष्ट्रात समाजवादी तत्त्वज्ञानाचा निष्ठेने प्रसार करण्याचा यशस्वी प्रयत्न एस.एम. यांनी यथाशक्ति केला. समाजवादी विचारसरणीचे एक प्रमुख अग्रणी, एक निष्ठावंत आधारस्तंभ म्हणूनच त्यांना ओळखले जात असे.    देशाला स्वातंत्र्य आणि देशबांधवांना अधिकाराचे जगणे मिळावे यासाठी त्यांनी वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष केले. १९ ऑगस्ट, १९३९ रोजी त्यांचे लग्न झाले. पण देशाच्या संसारात गुंतलेले हात घरच्या संसाराला हातभार लावायला मिळणे कठीण होते. यानंतरचे एस.एम. यांचे आयुष्य म्हणजे वाऱ्यासारखे वेगवान होते. युद्धविरोधी चळवळीसाठी तुरुंगवास, छोडो भारत चळवळ, राष्ट्रसेवा दल अशा अनेक कार्यातल्या त्यांच्या सहभागाने प्रापंचिक कर्तव्यांना मर्यादा पडल्या.

१९४२ च्या चलेजाव चळवळीत त्यांचा प्रमुख सहभाग होता. आधी महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत भाग घेतल्याबद्दल १९३० साली एक वर्षाचा आणि नंतर 'राॅय दिना'च्या दिवशी केलेल्या भाषणाबद्दल दोन वर्षांचा असा एकूण सुमारे ३ वर्षे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. साबरमती, नाशिक व येरवडा येथील तुरुंगांमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. या काळात त्यांना समृद्ध करणारा साने गुरुजींचा सहवास लाभला. पुढे राष्ट्रसेवा दलाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. या संघटनेच्या माध्यमातून युवकांना राष्ट्रवादाचे संस्कार देणे, त्यासाठी शिबिरे-संमेलने-मेळावे भरवणे, कलापथके स्थापन करून त्याद्वारे अस्पृश्यताविरोधी प्रचार, स्त्री-पुरुष समानतेच्या विचारांचा पाठपुरावा अशी अनेक रचनात्मक कामे त्यांनी केली. राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकात वसंत बापट, राजा मंगळवेढेकर, पु.ल.देशपांडे, निळू फुले, राम नगरकर, स्मिता पाटील इत्यादी दिग्गज कलावंत त्या-त्या काळात काम करत होते. यामागे प्रमुख प्रेरणा एस.एम. जोशी यांचीच होती. स्वातंत्र्य आंदोलनात काही काळ त्यांनी भूमिगत राहूनही कार्य केले.

एसएम जोशी हे संयुक्त महाराष्ट्र समितीचे सक्रिय सभासद होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत आणि त्यानिमित्त झालेल्या प्रत्येक सार्वजनिक सभेत एसएम यांची हजेरी असे.

📙 *प्रकाशित साहित्य*

नेताजींचे सीमोल्लंघन

मी एस् एम् (आत्मचरित्र)

📚 *एसएम जोशींवरील पुस्तके*

लोकशाही समाजवादाचा दीपस्तंभ (डाॅ. वासंती रासम आणि डाॅ. करिअप्पा खापरे)

🗽 *स्मारके*

एस. एम. जोशी हिंदी शाळा, पुणे.

एस. एम. जोशी काॅलेज, हडपसर (पुणे)

एस. एम. जोशी सभागृह, पुणे

एस. एम. जोशी अध्यापक विद्यालय, नाशिक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा