*नेते राम मनोहर लोहिया*
********************************
समाजवादी पक्षाचे प्रभावी कार्यकर्ते म्हणून स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला त्या राम मनोहर लोहिया यांचा जन्म २३ मार्च १९१० रोजी झाला.
देशात लोकशाही समाजवादी विचारसरणीचे लोण पसरविणारा हा स्वातंत्र्य पर्वातील आघाडीचा कार्यकर्ता अशी ओळख असणार्या राम मनोहर लोहिया यांचे शिक्षण कोलकाता, मुंबई आणि बर्लिन येथे झाले.
भारतातील समाजवादी चळवळीतील एक अग्रगण्य नेते आणि विचारवंत.
विद्यार्थिदशेतच १९२६ च्या गौहाती काँग्रेस अधिवेशनास ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांचा सुभाषचंद्र बोस आणि नेहरूंशी सहवास घडला आणि ते राष्ट्रीय चळवळीकडे आकृष्ट झाले.
बर्लिन मधून पीएचडी मिळवून ते भारतात परतले आणि सरकारी नोकरीचे आमिष लाथाडून स्वातंत्र्याच्या ध्येयप्राप्तीसाठी ‘चले जाव’ आंदोलनात उतरले.
१९४२ च्या ‘चलेजाव’ आंदोलनादरम्यान झालेल्या प्रतिकार सामर्थ्याचे जनक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. या आंदोलना दरम्यान आपल्या उपरोधिक शैलीत, विशिष्ट व्यक्ती व घटनांचे विश्लेषण करणारी भाषणे त्यांनी लिहिली. ती गुप्त रेडिओ केंद्रातून प्रसारित होत.
१९५५ मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. १९६३ पासून ते संसद सदस्य होते. समाजवादी चळवळीचे नेतृत्व करणार्या लोहियांनी समस्यांच्या संदर्भात स्वदेशी समाजवाद विकसित करण्याची भूमिका मांडली. त्यांनी इंग्रजी आणि हिंदीतून लेखन केले.
दुसऱ्या महायुद्धात त्यांनी प्रखर युद्धविरोधी आणि साम्राज्यशाही विरोधी भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना अटक झाली १९३९; पण न्यायालयात त्यांची सुटका करण्यात आली. त्यांना स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात एकोणीस वेळा तुरुंगावास घडला.
शेतकऱ्यांच्या चळवळी, आंग्रेजी हटाव आंदोलन, जाती तोडो आंदोलन, गोवा मुक्ती चळवळ, हिंदी राष्ट्रभाषेचा पुरस्कार, नेपाळमधील स्वातंत्र्य संघर्ष अशा अनेक चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले.
आर्थिक क्षेत्रात त्यांनी माफक यांत्रिकीकरणाचा पुरस्कार केला. यंत्र हे शोषणाचे साधन न बनता दारिद्र्यनिवारणाचे साधन बनावे. माणूस यंत्रामुळे आळशी, परावलंबी आणि एकाकी बनू नये, या म. गांधींच्या विचारांचा स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच त्यांच्यावर प्रभाव पडला होता. त्यामुळे लघुउद्योग, त्यांना उपयुक्त अशी यंत्रसामग्री आणि स्वावलंबन यांवर त्यांनी भर दिला.
लोहिया हे स्त्रियांच्या समस्यांची जाणीव असलेले एक विचारवंत होते. त्यांनी स्त्री-पुरुष समानतेचा तसेच आंतरजातीय विवाह, कुटुंब नियोजन आणि हुंडाबंदी इ. प्रागतिक विचारांचा हिरिरीने पुरस्कार केला. जातिसंस्था हा समाजवादाच्या मार्गातील मुख्य अडसर आहे, हे लक्षात घेऊन या सामाजिक अन्यायाविरुद्ध त्यांनी प्रखर संघर्ष उभा केला आणि अनुसूचित जातिजमातींची आघाडी उभारण्याचा प्रयत्न केला.
भारतीय समस्यांच्या संदर्भात स्वदेशी समाजवाद विकसित केला पाहिजे, अशी त्यांची मूलगामी भूमिका होती.
आज ते असते तर दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनात समाजवादाची जी बीजं आहेत त्याचा पुरस्कारच त्यांनी केला असता.
राम मनोहर लोहिया यांना विनम्र अभिवादन!
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق